भारतातील करोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब केला आहे. लीगमधील बायो बबलचा फुगा फुटल्यानंतर करोना विषाणूची प्रकरणे समोर आली. परंतु आता या लीगमधील उर्वरित सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. येणाऱ्या सप्टेंबरमध्ये सामन्यांचे आयोजन करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

क्रिकबझच्या अहवालानुसार एका फ्रेंचायझी अधिकाऱ्याने असे सांगितले आहे, की सप्टेंबरच्या विंडोचा विचार केला जात आहे. तोपर्यंत इंग्लंड-भारत मालिका संपेल आणि टी-२० वर्ल्डकपसाठी परदेशी खेळाडू सज्ज होतील. त्यामुळे ही छोटी विंडो आहे.

आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, “जर सप्टेंबरमध्ये विंडो उपलब्ध असेल, तर आम्हाला आयोजन करण्यास आवडेल. आम्हाला आयसीसी आणि इतर क्रिकेट बोर्डाच्या योजनांचे मूल्यांकन करावे लागेल. अशा परिस्थितीत सप्टेंबरच्या विंडोसाठी बीसीसीआयची काय योजना असेल हे पाहावे लागेल.”

१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात टी-२० विश्वचषक भारतात होणार आहे, पण सध्याच्या देशातील करोनाच्या स्थितीमुळे या स्पर्धेबाबतही शंका उपस्थित होत आहेत. यूएईकडे एक पर्याय स्थळ पाहिले जात आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकप यूएईमध्ये होऊ शकतो.

यावेळी, संघ आणि बीसीसीआय यांचे लक्ष विदेशी खेळाडूंना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याकडे आहे. केकेआरचा गोलंदाज वरुण चक्रवर्तीला करोनाची लागण झाली. त्यानंतर दिल्ली आणि हैदराबाद संघातील प्रत्येकी एक जण संसर्गित असल्याचे आढळले. चेन्नई सुपर किंग्जा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी यांलाही करोनाची लागण झाल्याचे आढळले. यानंतर बीसीसीआयकडे स्पर्धा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.