आयपीएल सुरळीत करून चाहत्यांची विश्वासार्हता मिळवण्यासाठी संचालन समितीच्या बैठकीमध्ये कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गटाला शिफारस करण्यासाठी सहा आठवडय़ांचा कालावधी देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयाने आयपीएलला जोरदार धक्का बसला होता. यामधून सावरण्यासाठी आयपीएलच्या संचालन समितीने पहिले पाऊल उचलले आहे.
संचालन समितीच्या बैठकीमध्ये लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर घातलेल्या बंदीवर चर्चा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समितीच्या निर्णयानुसारच कामकाज करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यगटाच्या सदस्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.
‘‘बीसीसीआय लोढा समितीच्या निर्णयाचा आदर करते आणि त्यांच्या निर्णयाचे पालन करण्याचे ठरवले आहे. समितीच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो, हे लवकर समजून घेण्याची गरज आहे. देशामध्ये क्रिकेटचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.
बीसीसीआयच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘‘आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी लोढा समितीच्या निर्णयावर अभ्यास करण्यासाठी कार्यगटाची स्थापना केली आहे. या कार्यगटाला लोढा समितीच्या निर्णयाचा अभ्यास करून शिफारस देण्यासाठी सहा आठवडय़ांचा कालावधी देण्यात आला आहे. हा कार्यगट आपली मते बीससीआय भागदारांचे हित जपण्यासाठी आम्ही सल्लागारांशी चर्चा केल्यावरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.’’
याबाबत आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ‘‘आम्ही लोढा समितीच्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी कार्यगटाची स्थापना केली असून ते सहा आठवडय़ांमध्ये आम्हाला अहवाल सादर करतील. त्यांच्या अहवालातील शिफारशींवर आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आहोत. यामध्ये आयपीएलचे आयोजन कसे करता येईल, स्पर्धेत किती संघ असावेत, संघामध्ये समभागधारक किती असावेत, त्याचबरोबर प्रायोजक, प्रसारणकर्ते, राज्य संघटना, कायदेतज्ज्ञ यांच्याबाबतही निरीक्षण नोंदवले जाणार आहे. या कार्यगटाचा अहवाल आयपीएलच्या संचाने समितीपुढे सादर केला जाईल आणि त्यानंतर बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीपुढे आम्ही हा अहवाल मांडणार आहोत.’’
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या टीकेबाबत बोलणे शुक्ला यांनी सोयीस्कररीत्या टाळले. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला हजर राहू शकले नाहीत; पण अजय शिर्के, रवी शास्त्री आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांनी बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला होता.

फ्रँचायझी कधी रद्द करता येऊ शकते
कलम ११.३ नुसार फ्रँचायझी किंवा फ्रँचायझीच्या समूहातील कंपनी किंवा फ्रँचायझीचे मालक यांच्यामुळे बीसीसीआय, आयपीएल, संघ किंवा क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचत असेल, तर फ्रँचायझी कधीही रद्द करता येऊ शकते.