आतापर्यंतच्या ११ हंगामानंतर आयपीएलने भारतासह जगभरातील क्रीडारसिकांच्या मनात जागा केली आहे. भारतामधील अनेक तरुण खेळाडूंना आयपीएलने अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र इंग्लंडचे माजी खेळाडू मायकल अथर्टन यांच्या मते आयपीएलने क्रिकेटच्या मुळ स्वरुपाची वाट लावली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या पुस्तक प्रकाशनादरम्यान अथर्टन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अवश्य वाचा –  वन-डे क्रिकेटमध्ये कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी – सौरव गांगुली

“माझ्या मते इतर गोष्टींप्रमाणे क्रिकेटही उध्वस्त झालेलं आहे. प्रत्येक खेळाडूंना विविध पर्याय उपलब्ध करुन देत आयपीएलने क्रिकेटची पूर्णपणे वाट लावली आहे.” टी-२० क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला असताना अथर्टन यांनी आपलं मत मांडलं आहे. या कार्यक्रमादरम्यान इंग्लंडचे माजी खेळाडू माईक गॅटींग आणि श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा हे देखील उपस्थित होते.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटला अजुनही भवितव्य आहे. भारतात तुम्हाला कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांची उपस्थिती कदाचीत लाभणार नाही. मात्र कसोटी क्रिकेटने आतापर्यंत प्रत्येक वेळा नवीन बदल आत्मसात केले आहेत, त्यामुळे भविष्यकाळासाठी मी सकारात्मक आहे. अथर्टन यांनी आपली बाजू मांडली. दिवस-रात्र कसोटी सामने हा कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी पर्याय ठरु शकतो का असा प्रश्न विचारला असता, प्रत्येक काम करणाऱ्या माणसाला आपला वेळ दिवस-रात्र कसोटी सामना पाहण्यासाठी देता येईल याची खात्री देता येत नाही, असं अथर्टन म्हणाले.