भारतीय क्रिकेटमध्ये IPL ही एक लोकप्रिय स्पर्धा आहे. IPL मुळे नवोदित क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना संधी मिळते. आतपर्यंत IPL मधील अनेक सामने रंगतदार झाले आहेत. IPL चे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तान मध्येदेखील PSL चे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. या स्पर्धेत देखील अनेक प्रतिभावंत खेळाडूचा समावेश आहे. PSL मधील गोलंदाजीचा दर्जा हा IPL पेक्षा चांगला असल्याचे वक्तव्य माजी कर्णधार वसीम अक्रमने केले होते. पण आता मात्र IPL स्पर्धा ही पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेपेक्षाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्पर्धा असल्याची कबुली अक्रमने दिली आहे.

IPL आणि PSLमध्ये खूप फरक आहे. गेल्या पाच-सहा वर्षात या दोन स्पर्धांमध्ये खूपच तफावत जाणवू लागली आहे. IPLमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जातो. एका संघाचं बजेट ६० ते ८० कोटी इतकं असतं. म्हणजे PSLच्या अंदाज दुप्पट… त्यामुळे त्यातून होणारा नफादेखील जास्त असतो. तोच आर्थिक नफा BCCI देशांतर्गत स्पर्धांसाठी वापरते. म्हणूनच IPL ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे”, असे वसीम अक्रम म्हणाला.

“IPLमधील खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंचे वैयक्तिक स्तरावर प्रशिक्षक असतात. खेळाडू अशा माजी क्रिकेटपटूंची निवड प्रशिक्षक म्हणून करतात ज्यांनी आधी त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळेच IPLमध्ये खेळताना खेळाडूंचा उत्साह आणि आत्मविश्वास दुप्पट असतो”, असेही अक्रम म्हणाला.

याआधी एका मुलाखतीत वसीम अक्रम म्हणाला होता, “मी गेली पाच वर्षे PSL चा भाग आहे. PSL कसं आहे हे मी पाहिलं आहे. पण परदेशी खेळाडूंच्या नजरेतून ते कसं आहे ते मी त्यांना विचारलं. त्यावेळी अनेक परदेशी खेळाडू म्हणाले की PSL मध्ये गोलंदाजीचा दर्जा हा IPL पेक्षा वरच्या स्तराचा आहे. IPL मध्ये प्रत्येक संघात असा एखादाच गोलंदाज दिसून येतो जो फलंदाजांच्या फटकेबाजीला लगाम लावेल. पण PSL मध्ये गोलंदाजांच्या कामगिरीचा दर्जा जास्त चांगला आहे.”