नवी दिल्ली : महिला क्रिकेटमधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही प्रगतिपथावर आहे. मात्र जर भारताच्या महिला क्रिकेट संघाने या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली असती तर ते आणखी फायदेशीर ठरले असते, असे भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजूम चोप्रा हिने सांगितले.

हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारताला या वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषकात अंतिम फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र विश्वचषक जिंकला असता तर क्रिकेटवेडय़ा भारतात महिला क्रिकेटने असाधारण उंची गाठली असती. ‘‘गेल्या वर्षी महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेत चार सामने खेळवण्यात आले होते. यंदा सात सामने होणार होते. या स्थितीत महिलांमधील आयपीएल प्रगतिपथावर आहे. जर ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताने यंदा जिंकला असता तर ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढली असती. विश्वचषकातील विजेता आणि उपविजेता यांच्यात हाच फरक असतो,’’ याकडे १७ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजूम हिने लक्ष वेधले.