आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं समजतंय.

“१९ सप्टेंबर (शनिवारी) ला स्पर्धेला सुरुवात होईल तर ८ नोव्हेंबर (रविवार) ला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे.” ब्रिजेश पटेल पीटीआयला ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला.

याआधी २६ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात होता. परंतु युएईवरुन भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टरोजी संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान ४ आठवडे मिळणार आहेत.