खराब कामगिरी आणि दुखापतींमुळे भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेला इरफान पठाण भारतीय संघात परतण्यासाठी आतुर आहे. या महिन्याअखेरीस होणाऱ्या विजय हजारे चषक स्पर्धेच्या निमित्ताने दमदार पुनरागमन करण्याचा निर्धार इरफान पठाणने व्यक्त केला.
‘‘तंदुरुस्त राहण्यासाठी फिजिओच्या मदतीने मी कसून प्रयत्न करत आहे. मी आता तंदुरुस्त आहे, रणजी करंडक स्पर्धेत तीन लढतीत मी बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. आगामी स्थानिक एकदिवसीय स्पर्धापर्यंत मी असाच तंदुरुस्त राहण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. आता माझे लक्ष लागले आहे ते भारतीय संघात स्थान मिळवण्याकडे. त्यासाठी मी जीवाचे रान करणार आहे,’’ असे इरफानने सांगितले.
हजारे चषक स्पर्धेत बडोद्याचा मुकाबला  २७ फेब्रुवारीला मुंबईशी होणार आहे. ‘भारतरत्न’सारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जाहीर झाला आहे. त्याबाबत विचारले असता इरफान म्हणाला, ‘‘सचिनला हा पुरस्कार मिळाल्याने सर्वच क्रीडापटूंना अनोखी प्रेरणा मिळाली आहे. सचिनचे यश चिरंतन स्मरणात ठेवावे असेच आहे. या पुरस्कासाठी तो योग्य खेळाडू आहे.’’