३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमार हा भारतीय गोलंदाजीचा प्रमुख हिस्सा मानला जातो आहे. आयपीएलमध्ये भुवनेश्वरला आपल्या कामगिरीने फारसं प्रभावित करता आलेलं नसलं तरीही विश्वचषकात भारतीय चाहत्यांना आणि कर्णधार विराट कोहलीला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. भुवनेश्वर कुमारनेही आगामी विश्वचषक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली खेळणं ही मानाची गोष्ट असल्याचं म्हणत आपल्या कर्णधाराचं कौतुक केलं आहे.

“विराटच्या नेतृत्वाखाली खेळणं ही निर्विवादपणे एक मानाची गोष्ट आहे. तो आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात काय सुरु आहे हे ओळखतो. तो मैदानात नेहमी आक्रमक असतो. एक गोलंदाज म्हणून अशा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणं हा माझा बहुमान आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आमचा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल याची मला खात्री आहे.” भुवनेश्वर कुमार एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.

आयपीएलआधी भुवनेश्वर कुमार घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. या मालिकेत त्याने ८ बळी घेतले. त्याआधी न्यूझीलंड दौऱ्यातही भुवनेश्वर कुमारने आश्वासक कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – आनंदाची बातमी ! केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त