कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर विराट कोहली, शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने आश्वासक मारा करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचं पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली.

भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा करत दोन्ही डावांत ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळलं. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावांत २ बळी घेतले. दोन्ही डावांत ६ बळी घेत बुमराहने मेलबर्नमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कामगिरीशी बुमराहने बरोबरी केली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.