भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव बीसीसीआय यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्याच्या तयारीत आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी प्रत्येक क्रीडा संस्थेला दोन नावांची शिफारस करायची असते. २०१९ साली बुमराहचं नाव चर्चेत होतं, मात्र रविंद्र जाडेजासोबतच्या शर्यतीत बुमरहाचं नाव मागे पडलं होतं. गेल्या काही वर्षांमधली बुमराहची कामगिरी पाहता बीसीसीआयचे अधिकारी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी दोन खेळाडूंची नावं पाठवण्याचं ठरवल्यास सलामीवीर शिखर धवनचं नावही चर्चेत असल्याचं समजतंय. २०१८ सालच्या पुरस्कारासांठी धवनचं नाव बीसीसीआयने पाठवलं होतं, मात्र अंतिम यादीत त्याला स्थान मिळू शकलं नाही. २०१९ साली बीसीसीआयने बुमराह, रविंद्र जाडेजा आणि शमी या ३ खेळाडूंच्या नावाची शिफारस केली होती, ज्यात अंतिम यादीत फक्त रविंद्र जाडेजाला स्थान मिळालं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बुमराहची कामगिरी अतिशय चांगली राहिलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १४ कसोटीत ६८ बळी, ६४ वन-डे सामन्यांत १०४ बळी आणि ५० टी-२० सामन्यात ५९ बळी अशी बुमराहची आतापर्यंतची कामगिरी राहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी बुमराह आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता.