भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. झुलनने आतापर्यंत ६८ टी-२०, १६८ वन-डे आणि १० कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाची सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून झुलन गोस्वामीची ओळख होती. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना झुलनने, बीसीसीआय व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत.

महिला वन-डे क्रिकेटच्या इतिहासात झुलनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे. २०१७ साली इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकातही झुलनने महत्वाची कामगिरी बजावली होती. २००७ साली झुलनने आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कारही पटकावला होता. याव्यतिरीक्त अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यासारखे मानाचे पुरस्कार झुलन गोस्वामीच्या खात्यात आहेत.