India vs England 2nd Test : चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पदार्पणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. ४८२ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ १६४ धावांपर्यंत मजल मारु शकला. त्यामुळे भारतीय संघानं दुसरा कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकला. या विजयासाह भारतीय संघानं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. विराट कोहली आणि कंपनीनं इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट याचा आशिया खंडातील विजयरथ अखेर रोखला आहे. लागोपाठ सहा सामन्यात विजय संपादन केल्यानंतर जो रुट याला आशिया खंडात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. याआधी जो रुटच्या नेतृत्वाली इंग्लंड संघानं श्रीलंका आणि भारताचा पराभव केला होता. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात भराताचा पराभव करत जो रुट यानं आशिया खंडात विजयी षटकार लगावला होता. जो रुटनं श्रीलंकेला पाच आणि भारतीय संघाला एक वेळा पराभूत केलं आहे. त्यानंतर सातव्या सामन्यात जो रुटला पराभवाचा सामना करावा लागला. २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना दिवसरात्र खेळवला जाणार आहे. Joe Root as Test Captain In Asia Won by 211 runs vs SL Won by 57 runs vs SL Won by 42 runs vs SL Won by 7 wickets vs SL Won by 6 wickets vs SL Won by 227 runs vs IND Lost by 317 runs vs IND*#INDvsENG — CricBeat (@Cric_beat) February 16, 2021 आणखी वाचा- WTC : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात विस्फोटक सलामी फलंदाज रोहित शर्माची शतकी खेळी, आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी आणि पदार्पणवीर अक्षर पटेल याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं निर्वादित वर्चस्व गाजवलं. पहिल्या डावांत रोहित शर्माच्या १६१ धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं ३२९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विन यानं पाच बळी घेतले तर दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत सामन्यात ८ बळी मिळवले आहेत. त्याशिवाय दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना अश्विन यानं शतकी खेळी केली होती. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं दुसऱ्या डावांत अचूक टप्यावर मारा करत पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत दोन आणि दुसऱ्या डावांत पाच बळी घेत सामन्यात सात बळी मिळवले आहेत. कुलदीप यादव याला दोन बळीवर समाधान मानवं लागलं. ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यानं पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांत विराट कोहलीनं महत्वाची अर्धशतकी खेळी केली.