विजय हजारे करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या कर्नाटकची विजयी घौडदौड अजुनही कायम सुरु आहे. देवधर चषकात कर्नाटकने भारत अ संघावर ६५ धावांनी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत कर्नाटकची गाठ श्रेयस अय्यरच्या भारत ब संघाशी पडणार आहे.

रविकुमार समर्थ आणि पवन देशपांडेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर कर्नाटकने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावांपर्यंत मजल मारली. या दोघांव्यतिरीक्त स्टुअर्ट बिन्नी आणि यष्टीरक्षक सी. एम. गौतम यांनी यांनीही ६ षटकांमध्ये फटकेबाजी करत ७२ धावां केल्या. भारत अ संघाकडून मोहम्मद शमीने १० षटकांमध्ये तब्बल ९६ धावा मोजल्या.

प्रत्युत्तरादाखल भारत अ संघ ३९.५ षटकांमध्ये २७४ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारत अ संघाकडून उन्मुक्त चांदने ८१ तर इशान किशनने ७३ धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. कर्नाटककडून फिरकीपटू कृष्णप्पा गौतमने ४ गडी टिपले.

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक ३३९/४ (रविकुमार समर्थ ८५, पवन देशपांडे ९५, सी. एम. गौतम ४९) विरुद्ध भारत अ सर्वबाद २७४ (उन्मुक्त चंद ८१, इशान किशन ७३. कृष्णप्पा गौतम ४/५२) निकाल – कर्नाटक ६५ धावांनी विजयी