आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं भवितव्य अजुनही अंधारात आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. भारतीय खेळाडूही या काळात घरात थांबून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा खेळवता येईल का यावर विचार करत आहे. त्यातच काही संघमालकांनी छोट्या स्वरुपात आयपीएल स्पर्धा खेळवण्याची तयारी दाखवली होती. सोशल मीडियावरही आयपीएलचे संघ विविध माध्यमातून आयपीएलचा माहोल कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी लाईव्ह चॅटमध्ये युजवेंद्र चहलला ट्रोल केलं होतं. चहल फलंदाजीला आल्यानंतर आपण त्याला बादच करायचं नाही आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण कसं असेल यावर रोहित-बुमराह चर्चा करत होते. यावरुनच मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवर बुमराहने चहलला गोलंदाजी केली तर ते षटक कसं जाईल असा प्रश्न विचारला.

मुंबई इंडियन्सच्या या प्रश्नावर चहलनेही आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देत, आधी फिंच-एबी आणि विराटला बाद करा आणि मग मला बॉलिंग करण्याची स्वप्न पाहा असं सडेतोड उत्तर दिलं आहे.

भारतातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये अद्याप करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या काळात आयपीएल स्पर्धा खेळवायची असल्यास बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.