महाराष्ट्राने पदकांचे द्विशतक ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत करत सोनेरी कामगिरी कायम ठेवली. राज्याची आता ६३ सुवर्ण, ६२ रौप्य आणि ७९ कांस्यपदकांसह एकूण २०४ पदके झाली आहेत. सोमवारी महाराष्ट्राने जलतरणातील सोनेरी कामगिरी कायम राखतानाच बॉक्सिंगमध्येही राज्याच्या नऊ खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. टेनिसमध्येही ध्रुव आणि आकांक्षा नित्तुरे यांनी अंतिम फेरी गाठली. सोमवारी एका दिवसात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी सहा पदके राज्याच्या जलतरणपटूंनी मिळवली.

केनिशा गुप्ताने (मुलींच्या १७ वर्षांखालील) २०० मीटर वैयक्तिक मिडले रिले शर्यतीत सुवर्ण जिंकले. केनिशा आणि अपेक्षा यांनी करिना शांता आणि पलक धामी यांच्या साथीत (१७ वर्षांखालील) ४ बाय १०० मीटर मिडले रिले शर्यतीचेही सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या (१७ वर्षांखालील) गटात वेदांत बापनाने २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याच वयोगटात सुश्रूत कापसेने ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले. रितेश म्हैसाळने युवा गटाच्या (८९ किलो) विभागात रौप्यपदक मिळवले.