ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. भारताने दिलेलं २५१ धावांचं लक्ष्य पार करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २४२ पर्यंतच मजल मारु शकला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीचं शतक, कुलदीप यादव-जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि विजय शंकरचं अप्रतिम शेवटचं षटक यांचा मोठा वाटा होता. कोहलीने नागपूरच्या मैदानावर आपल्या कारकिर्दीतलं ४० वं वन-डे शतक झळकावलं. त्याच्या या शतकानंतर आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने विराटचं कौतुक करत त्याला एक अनोखं आव्हान दिलं आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ वन-डे शतकं जमा आहेत. सचिनचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी कोहलीला आता १० शतकांची गरज आहे. सध्याचा कोहलीचा फॉर्म पाहता तो सचिनचा विक्रम येत्या काळात लवकरच मोडेल अशी आशा सर्वच ठिकाणातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सचिनचा विक्रम कोहली मोडेल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.