भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ३ टी-२०, ३ वन-डे सामन्यांची मालिका आटोपल्यानंतर १ ऑगस्टपासून भारत व इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नवनवीन विक्रम करणाऱ्या भारतीय संघाची ही सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात किंवा भविष्यकाळात विराट कोहली मैदानात किती धावा काढतो यापेक्षा संघाला एकत्र घेऊन बिकट परिस्थितीत कशी वाट काढतो यावर त्याची पारख केली जाणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कोहलीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या Cricbuzz Unplugged या कार्यक्रमात बोलत असताना गांगुलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

“विराट कोहली किती धावा काढतो यापेक्षा तो आपल्या संघाची एकत्र मोट कशी बांधून ठेवतो यावरुन त्याची पारख केली जाईल. आगामी इंग्लंड दौऱ्यात त्याला मार्गदर्शन करणारी चांगली लोकं सोबत असल्यास त्याच्यासाठीही काही गोष्टी सोप्या होऊन जातील.” इंग्लंडमध्ये २००७ सालानंतर भारताला कसोटी विजय संपादन करता आलेला नाहीये. २००७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामना जिंकला होता. त्यामुळे यंदाच्या दौऱ्यात विराट कोहलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. या दौऱ्यात भारताने चांगली कामगिरी केल्यास आगामी स्पर्धांसाठी हा विजय भारतीय संघाचं मनोबल वाढवू शकतो.