पालेमबंग : टेनिसमधील भारताचा एकमेव ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता खेळाडू लिएण्डर पेसने माघार घेतल्यामुळे आमच्या पदक मिळवण्याचा मार्ग खडतर झाला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार व प्रशिक्षक झिशान अली यांनी व्यक्त केली.

‘‘पेसचे मन वळवण्याबाबत मी खूप प्रयत्न केले, मात्र दुहेरीतील खेळाडूंच्या निवडीबाबत झालेल्या मतभेदांमुळे त्याने येथे न येण्याचा निश्चय केला आहे. त्याच्या देशनिष्ठेबाबत कोणीही आव्हान देऊ शकणार नाही. त्याने कायमच देशनिष्ठेस प्राधान्य दिले आहे. पेस याच्या अनुपस्थितीमुळे दुहेरीतील जोडीबाबत खूप अडचणी निर्माण होणार आहेत. त्याची अनुपस्थिती आम्हा सर्वानाच जाणवणार आहे. त्याचा अनुभव हा अन्य सहकाऱ्यांना कायमच प्रेरणादायक असतो. शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत मला दुहेरीतील खेळाडूंची नावे द्यावयाची आहेत,’’ असे अली यांनी सांगितले.