राजकोट स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णीत राहीली. इंग्लंडच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाला ५२.३ षटकांत पाचव्या दिवसाच्या अखेरीस ६ बाद १७२ धावा करता आल्या. विराट कोहली ४९, तर जडेजा ३२ धावांवर नाबाद राहिला. कसोटीच्या पाचव्या दिवशी उपहारानंतर अलिस्टर कूक १३० धावांवर झेलबाद झाल्यावर ३ बाद २६० धावांवर इंग्लंडने आपला डाव घोषित केला आणि भारताला विजयासाठी ३१० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खराब सुरूवात केली. सलामीवीर गौतम गंभीर आपले खाते देखील उघडू शकला नाही. गंभीर स्लिपमध्ये झेलबाद होऊन शून्यावर माघारी परतला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी सुरू केला. पण यावेळी पुजारा स्वस्तात बाद झाला. रशीदच्या गोलंदाजीवर पुजारा पायचीत होऊन माघारी परतला. भारताची धावसंख्या ६८ असताना मुरली विजय बाद झाला आणि भारतीय संघ बॅकफूटवर गेला. अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर क्लीनबोल्ड होऊन माघारी परतल्यावर भारतीय संघाच्या अडचणींत वाढ झाली. त्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले. रहाणे बाद झाल्यानंतर विराटने अश्विनला साथीला घेऊन खिंड लढवली. अश्विन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. साहा देखील स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, जडेजाने कोहलीला अखेरपर्यंत साथ देत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडच्या मोईन अली याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मोईन अलीने सामन्यात शतकी कामगिरीसह तीन विकेट्स देखील घेतल्या. इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत २ बाद २६० धावांच्या आघाडीची नोंद केली होती. सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांकडून चाहत्यांना बऱयाच अपेक्षा होत्या. पण भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. हमीद आणि कूक यांनी चांगली फटकेबाजी केली. सुरूवातीची काही षटके खेळून काढल्यानंतर दोघांनीही आक्रमक फलंदाजी सुरू केली. भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत असलेली कूक आणि हमीदची जोडी अखेर ५९ व्या षटकात फुटली. अमित मिश्राच्या फिरकीवर मोठा फटका मारताना हमीद ८२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर जो रुट देखील मैदानात आक्रमक पवित्रा घेऊनच उतरला. पण त्याचे मनसुबे मिश्राने फोल ठरवले. जो रुटला मिश्राने स्वस्तात माघारी धाडले. दुसऱया बाजूने कूकने आपली फटकेबाजी कायम ठेवून आपले ३० वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक साजरे केले. कसोटी विश्वात ३० वे शतक गाठणारा कूक हा १३ वे खेळाडू ठरला. सामन्याची सध्याची परिस्थितीपाहून कसोटी अनिर्णित राहिल असेच चित्र सध्या आहे. उपहारानंतर कूकने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि मोठा फटका मारताना तो १३० धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने कूकचा झेल टीपला. कूक बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाने आपला डाव घोषित केला आणि भारतासमोर ३१० धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३७ धावांचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव चौथ्या दिवशी ४८८ धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४९ धावांची घेता आली होती. Cricket Score of India vs England : दिवसभरातील अपडेट्स-