भारतीय संघाने मोहालीच्या स्टेडियमवरील गेल्या २२ वर्षांपासूनचा विजयी इतिहास कायम राखत इंग्लंडविरुद्धची कसोटी ८ विकेट्सने जिंकली आहे. इंग्लंडच्या संघाने दुसऱया डावात भारतीय संघासमोर विजयासाठी १०३ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. भारताने २ विकेटच्या मोबदल्यात इंग्लंडचे कमकुवत आव्हान गाठले आणि विजय साजरा केला. भारतीय संघाकडून दुसऱया डावात पार्थिव पटेल याने नाबाद ६७ खेळी केली. तर विराट कोहली ६ धावांवर नाबाद राहीला. मुरली विजय यावेळी वोक्सच्या बाऊन्सवर स्लिपमध्ये शून्यावर झेलबाद होऊन माघारी परतला. तर विजयासाठी केवळ १५ धावांची गरज असताना चेतेश्वर पुजारा रशीदच्या फिरकीवर झेलबाद झाला. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय गोलंदाजांनी २३६ धावांत संपुष्टात आणला होता. त्यामुळे इंग्लंडला केवळ १०३ धावांचे आव्हान ठेवता आले. इंग्लंडचे आव्हान भारतीय संघाने चौथ्या दिवसाच्या तिसऱया सत्रात पूर्ण केले. दुसऱया डावात भारतीय संघाकडून अश्विनने तीन, तर शमी, जडेजा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून जो रुट याने एकाकी झुंज दिली. जो रुटने सर्वाधिक ७८ धावा केल्या, तर बोटाच्या दुखापतीमुळे सलामीवीर हमीदला यावेळी आठव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आले होते. बोटाच्या दुखापतीवर मात करुन या युवा खेळाडूने संघासाठी नाबाद ५९ धावांचे योगदान दिले. चौथ्या दिवासाच्या सुरूवातीलाच रवींद्र जडेजाने इंग्लंडला पाचवा धक्का दिला. चौथ्या दिवसाच्या आपल्या पहिल्याच षटकात जडेजाने इंग्लंडच्या बॅटीला पायचीत केले. यानंतर जयंत यादवच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात जोस बटलर देखील झेलबाद होऊन माघारी परतला. इंग्लंडचा भरवशाचा खेळाडू जो रुटने मैदानात तग धरून अर्धशतक पूर्ण केले. हमीद आणि जो रुट यांनी संथ गतीने फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. जो रूट आणि हमीद जोडी डोकेदुखी ठरत असताना जडेजाच्या गोलंदाजीवर जो रुटचा अजिंक्य रहाणेने पहिल्या स्लिपमध्ये अप्रतिम झेल टीपला. जो रुट ७८ धावा करून माघारी परतला. दुसऱया सत्रात हमीदने फटकेबाजी करुन संघाला १०० धावांच्या आघाडीचा आकडा गाठून दिला. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱया डावात इंग्लंडचे चार फलंदाज अवघ्या ७८ धावांत माघारी परतले होते. भारतीय संघाकडे सध्या फक्त ५६ धावांची आघाडी असली तरी इंग्लंडचे चार महत्त्वाचे फलंदाज तंबूत दाखल झाल्याने इंग्लंड बिकट स्थितीत सापडला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४१७ धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडवर १३४ धावांची आघाडी घेतली. आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी यावेळी चमकदार कामगिरी केली. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ९० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर अश्विनने ७२ धावांचे योगदान दिले. जयंत यादवने जडेजाला उत्तम साथ देऊन आंतरराष्ट्रीय कसोटीमधील आपले पहिलेवहिले अर्धशतक साजरे केले. जयंत यादवने ५५ धावा ठोकल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने यावेळी पाच विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू रशीदने चार भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोलंदाजांला यश मिळाले नाही. Live Cricket Score, India vs England-