घरच्या मैदानात मालिका विजयाचा मानाचा तुरा शिरपेचात खोवण्याची सुवर्णसंधी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गमावली आहे. रांची येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला १९ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव २४१ धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक ५७ धावांची खेळी साकारली, तर विराट कोहलीने ४५ धावा केल्या. किवींकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट आणि नीशाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडने या विजयासाठी पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे पाचवा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर विजयासाठी २६१ धावांचे आव्हान ठेवले होते. किवींच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात तशी चांगली झाली होती. रोहित आणि रहाणे संयमी फलंदाजी करत असताना रोहितने ११ धावांवर आपली विकेट टाकली. त्यानंतर रहाणे आणि कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱया विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली. रहाणे याने आपल्या नजाकती फटक्यांनी स्टेडियमच्या चारही बाजूंना दमदार फटके मारले आणि आपले १६ वे अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघ सामन्यावर पकड निर्माण करत असतानाच विराट कोहली (४५) धावांवर झेलबाद झाला. ईश सोधीने कोहलीची विकेट घेतली. मग रहाणे देखील ५७ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. धोनी यावेळी मॅच विनिंग खेळी साकारण्यात अपयशी ठरला. धोनीने तब्बल ३१ चेंडूत केवळ ११ धावा केल्या. धोनी क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव गडगडला. अक्षर पटेल याने ३८ धावांचे योगदान देऊन सामना जिवंत ठेवला होता. पण ठराविक अंतराने भारताचे एकामागोमाग एक विकेट्स पडत गेले आणि भारतीय संघाला १९ धावांनी पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, सामन्याचा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय स्विकारली होता. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात दमदार झाली होती. मार्टीन गप्तील आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेल याने सामन्याच्या १६ व्या षटकात पहिले यश मिळवून दिले. लॅथम ३९ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि गप्तील यांनी संयमी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्तील याने यावेळी सर्वाधिक ७२ धावांची खेळी साकारली. तर केन विल्यमसन याने ४१ धावा केल्या. भारतीय संघाकडून अमित मिश्रा याने दोन विकेट् घेतल्या, तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सामन्याच्या २६ व्या षटकात हार्दीक पंड्या पुन्हा एकदा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. पंड्याने मार्टीन गप्तील याला ७२ धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. यानंतर अमित मिश्रा याने आपली फिरकी जादू दाखवत किवींच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. किवींच्या चार विकेट पडल्यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावसंख्येला चांगला लगाम घातला. ५० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड संघाला २६० धावांवर समाधान मानावे लागले. India vs New Zealand: दिवसभरातील अपडेट्स