आश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारताने तिसरा आणि अंतिम कसोटी सामना एक दिवस राखून तब्बल ३२१ धावांनी जिंकला आहे. भारताने दिलेल्या ४७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकी समोर शरणागती पत्करली. सुरुवातील उमेश यादवने दिलेल्या धक्क्यातून सावरणाऱ्या न्यूझीलंडला आश्विन आणि जडेजाने सावरण्याची संधी दिली नाही. आश्विनने या सामन्यात तब्बल ७ गडी टीपले तर जडेजाने २ गडी बाद करुन भारताचा विजय सुकर केला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्तील हा एकमात्र फलंदाज भारतीय फिरकीसमोर तग धरताना दिसला. भारताच्या विजय लांबवत असलेल्या गप्तीलला जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजीला आश्विने सुरुंग लावला. यापूर्वी चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने शतक साजरे केल्यानंतर भारताने ३ बाद २१६ धावांवर डाव घोषित केला. चेतेश्वर पुजारा १०१ तर अजिंक्य रहाणे २० धावांची नाबाद खेळी केली. भारताने दिलेल्या डोंगरा एवढ्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने सलामवीर लॅथमला पायचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले. टॉम लॅथमनंतर मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा कर्णधार संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखविला. कर्णधाराची जागा घेतलेल्या रॉस टेलरने आक्रमक खेळी करत भारतीय फिरकीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला. टेलर स्थिरावत असताना आश्विनने त्याला चकवत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर आश्विनने रॉंचीला बाद करत भारताला आणखी एक यश मिळवून दिले. मालिकेतील आश्विनचा हा २३ वा बळी होता. आश्विननंतर जडेजाने आपल्या फिरकीतील जादू दाखवली. रॉचीची जागा घेण्यासाठी आलेल्या जेम्सला त्याने खाते ही न खोलता चालते केले. त्यानंतर संयमी खेळी करणाऱ्या मार्टिन गप्तिलला बाद करत जडेजाने भारताच्या विजयातील मोठा अडथळा दुर केला.