नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताचा पहिला डाव २१५ धावांत संपुष्टात आणला. तर, प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजांनीही आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना स्वस्तात चालते केले. पहिल्या दिवसाअखेर द.आफ्रिकेची धावसंख्या २ बाद ११ अशी आहे.

नागपूरच्या जामठा स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱया कसोटी सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण, भारतीय फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक देखील गाठता आले नाही. फलंदाजीची सुरूवात चांगली झाली होती. पण, गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतासाठी चिंतेची बाब ठरत असलेल्या शिखर धवनने यावेळीही निराशा केली. शिखर केवळ १२ धावा करून माघारी परतला तर, मुरली विजय अर्धशतकाच्या दिशेने आगेकूच करत असताना ४० धावांवर मॉर्केलच्या गोलंदाजीवर पायचित बाद झाला. सलामी जोडी तंबूत दाखल झाल्यानंतर  चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. उपहारापर्यंतच्या धावसंख्येनुसार भारताची धावसंख्या २ बाद ८५ अशी होती. पण, उपहारानंतरच्या सत्रात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर पुनरागमनाची कोणतीही संधी न देता कोहली(२२), पुजारा(२१) आणि रहाणे(१३) यांना स्वस्तात चालते केले. त्यामुळे भारतीय संघ सध्या बिकट स्थितीत सापडला.

वृद्धिमान साहाने(३२) मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला पण धावफलक हलता ठेवण्यात त्याला अपयश आले. रोहित शर्मा देखील अवघ्या दोन धावांवर माघारी परतला. तर, रविंद्र जडेजाने ३४ धावा केल्या. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने तीन तर, सिमोन हार्मेरने चार विकेट्स घेतल्या. रबाडा आणि एल्गर यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले. प्रत्युत्तरात भारतीय फिरकीपटूंनीही संघाला चांगली सुरूवात करून दिली. आर.अश्विनने द.आफ्रिकेचा सलामीवीर स्टॅनिअल व्हॅन झील याला शून्यावर माघारी धाडले तर, रविंद्र जडेजाने इम्रान ताहिरचा त्रिफळा उडवून संघाला दुसरे यश मिळवून दिले.

सध्याची धावसंख्या-
भारत- पहिला डाव सर्वबाद २१५
द.आफ्रिका- पहिला डाव- २ बाद ११*