IPL : चेन्नई आणि मुंबई यांच्यात आज प्ले ऑफ्सचा पहिला सामना आहे. या सामन्यात जो संघ विजेता ठरेल, तो थेट अंतिम फेरीत धडक मारेल. तर जो संघ पराभूत होईल त्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. रविवारी जेव्हा हा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात होणार हे पक्के ठरले, तेव्हापासूनच दोनही संघांचे फॅन्स इंटरनेटवर जोरदार चर्चा करत आहे. एकमेकांना ट्रोल करत आहेत. या दरम्यान ‘लोकसत्ता’च्या वाचकांच्या मते मात्र मुंबईच हा सामना जिंकणार, असे दिसत आहे.

हे वाचा – IPL 2019 : चेन्नईपुढे मुंबईच ‘सुपर किंग’!; पहा काय सांगते आकडेवारी

मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या दोघांनी आजपर्यंत अप्रितम कामगिरी केली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानात आतापर्यंत चांगले निर्णय घेताना दिसला आहे. तर चेन्नईचा ‘कॅप्टन कूल’ धोनी याने तर आपले नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे. या दोनही संघांनी ३-३ वेळा IPL च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे या सामन्यात आणि स्पर्धेत दोनही संघांना समान संधी आहे. पण Loksatta Poll मध्ये विचारलेल्या प्रश्नावर तब्बल ७२ टक्के वाचकांनी मुमबीच्या संघाला आपली पसंती दर्शवली आहे.

IPL 2019 : वानखेडे मैदानावर मुंबईच्या ‘हिटमॅन’चे अनोखे दीडशतक

फेसबुकवर लोकसत्ताच्या अंदाजे ५ हजार २०० वाचकांनी मत नोंदवले आहे. त्यात ३ हजार ७०० वाचकांनी मुंबईच सामना जिंकणार असे मत व्यक्त केले आहे तर चेन्नईच्या बाजूने १ हजार ४०० मते नोंदवण्यात आली आहेत. तसेच ट्विटरवरदेखील लोकसत्ताच्या ७२ टक्के वाचकांनी मुंबईला पसंती दर्शवली आहे, तर २८ टक्के वाचक चेन्नईच्या बाजूने आहेत.

IPL 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध मुंबई २-० ने आघाडीवर

या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले. या दोनही सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला. ३ एप्रिलला हे दोन संघ पहिल्यांदा या स्पर्धेत आमने सामने आले होते. त्यावेळी जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली होती. इतकेच नव्हे तर चेन्नई सुपरकिंग्जवर ३७ धावांनी मात करत मुंबईने IPL 2019 मधील चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली होती.

IPL 2019 : विजय मुंबईचा पण चर्चा कृणाल पांड्याची…

दुसऱ्या वेळी हे दोन संघ स्पर्धेत आमने सामने आले असताना मुंबईने चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत केले. यंदाच्या हंगामात चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवले आणि चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या.

IPL चा इतिहास मुंबईच्या बाजूने

मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण २६ सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने १५ सामने जिंकले आहेत, तर ११ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने ४-२ अशी आघाडी राखली आहे.

IPL 2019 : ‘…म्हणून हार्दिकशी हातमिळवणी नाही’ – हर्षा भोगले

मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. पण मधल्या सामन्यात काही पराभव पत्करावे लागल्याने दोनही संघ थोडे अडखळले. पण अखेर चेन्नईने सर्वप्रथम प्ले ऑफ्स फेरी गाठली. पंजाबविरुद्ध शेवटचा साखळी सामना पराभूत होऊनही चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल होता. पण मुंबईने कोलकाताला धूळ चारत गुणतालिकेत अग्रक्रम पटकावला.

आता पहिला प्ले ऑफ्स सामना चेन्नईमध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इतिहासाची पुनरावृत्ती करणार की चेन्नई नव्या इतिहासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.