आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत असताना झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला संघात स्थान नाकारण्यात आलं. परंतू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आल्यानंतर काही तासांनी रोहित मुंबई इंडियन्सकडून सरावासाठी मैदानात उतरल्यामुळे संभ्रम वाढला. तसेच काही दिवसांनी रोहितने पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्र हाती घेत मैदानावर उतरणं पसंत केलं. रोहितच्या निवडीवरुन सोशल मीडियावर संभ्रमाचं वातावरण तयार झाल्यानंतर बीसीसीआयने संघात काही बदल करत रोहितला कसोटी संघात स्थान दिलं. परंतू आयपीएल संपल्यानंतर रोहितने भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला न जात NCA मध्ये फिटनेसवर काम करणं पसंत केलं. आजही रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. २७ तारखेपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या वन-डे सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या दुखापतीबद्दल असलेल्या अनिश्चीततेच्या वातावरणावर भाष्य केलं. आहे.

“दुबईत निवड समितीची बैठक होण्याआधी आम्हाला दोन दिवस इ-मेल आला होता. ज्यात रोहित दुखापतीमुळे खेळू शकणार नाही असं नमूद केलं होतं.” पहिल्या सामन्याआधी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत विराटने माहिती दिली. त्यावेळी रोहितला बरं होण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागेल असं आम्हाला कळलं होतं. त्याला झालेल्या दुखापत आणि संघनिवडीबद्दलच्या सर्व गोष्टींची त्याला कल्पना देण्यात आली होती आणि त्यालाही हे चांगलंच माहिती होतं. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल हे आम्हाला समजल्यानंतर संघाची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेचच रोहित सरावासाठी मैदानात उतरला. त्याने आयपीएलमध्ये काही सामनेही खेळले. ते पाहून आम्हाला वाटलं की तो आमच्यासोबत ऑस्ट्रेलियाला येईल, पण तो आला नाही. तो आमच्यासोबत का आला नाही याचं कारण मला अजुनही माहिती नाही.

आयपीएलच्या उत्तरार्धात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा पूर्णपणे फिट नसल्याचं जाहीर केलं होतं. तरीही सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात रोहितने पुनरागमन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नवीन घडामोडीनुसार ११ डिसेंबर रोजी रोहित शर्माची NCA मध्ये फिटनेस टेस्ट होणार आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. याव्यतिरीक्त रोहितच्या दुखापतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे तो खेळणार आहे की नाही याबद्दल आमच्यातही संभ्रम आहे, जो चांगला नाही, असं मत विराट कोहलीने व्यक्त केलं.