अमरावतीने पुण्याचे खेळाडू खेळवल्याच्या निषेधार्थ नांदेड संघाचा ठिय्या

नवी मुंबई येथील फादर अ‍ॅग्नेल स्कूल येथे सुरू असलेल्या ६७व्या वरिष्ठ आंतरजिल्हा बास्केटबॉल पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पध्रेत सहभागी झालेल्या बहुतांश संघांचा भार  इतर जिल्ह्यतील खेळाडूच वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडच्या मुलांच्या संघांनी याबाबत रितसर तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. या तक्रारीवर २४ तास उलटूनही राज्य संघटनेकडून सबुरीचा सल्ला मिळत असल्यामुळे बुधवारी नांदेडच्या खेळाडूंनी निषेध नोंदवत मैदानावरच ठिय्या आंदोलन केले.

या गोंधळाच्या स्थितीमुळे बुधवारच्या सकाळच्या सत्रातील सामने सायंकाळी व सायंकाळच्या सत्रातील लढती गुरुवारी खेळवण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. एका खेळाडूला वर्षांतून एकदा हस्तांतरण करण्याची मुभा आहे, परंतु त्यावर देखरेख करण्यासाठी राज्य संघटनेकडे यंत्रणाच कार्यन्वित नसल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या यजमानपदाखाली या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी उपउपांत्यपूर्व फेरीत अमरावती विरुद्धच्या लढतीत नांदेड संघाने निषेध नोंदवत खेळ केला.

अमरावतीने पुणे जिल्ह्यातील सिद्धांत शिंदे, अजिंक्य माने व एडविन एर्विन या खेळाडूंना संघात सहभागी केले होते. त्याविरोधात नांदेडने राज्य संघटनेकडे लेखी तक्रार दाखल केली. मात्र बुधवापर्यंत या तक्रारीवर संघटनेकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने नांदेडच्या खेळाडूंनी ठिय्या आंदोलन केले.

‘‘अमरावतीच्या संघात पुण्यासह, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ आदी जिल्ह्यांचे खेळाडू खेळत आहेत. त्यांच्याकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही नाही. ही बाब आम्ही राज्य संघटनेच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्याकडून आम्हाला उत्तराची प्रतीक्षा आहे,’’ असे मत नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गोस्वामी यांनी दिली.

‘‘संपूर्ण स्पध्रेत ५० ते ६० असे खेळाडू आहेत की जे वेगवेगळ्या जिल्ह्यंतून खेळले आहेत. ही खुली स्पर्धा असल्यामुळे त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही,’’ असे अमरावती जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव आणि राज्य संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख यांनी सांगितले. मात्र याबाबतच्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत विचारणी केली असता त्यांनी सांगितले की, ‘‘या प्रकरणावर निकाल अजून लागला नसल्यामुळे मी ती देऊ शकत नाही.’’

अमरावतीला खेळण्याची परवानगी

अमरावती आणि पुणे जिल्हा संघटनांकडून या संदर्भात लेखी खुलासा मागवला होता. दोन्ही संघांकडे ना हरकत प्रमाणपत्र आहे. त्यामुळे नांदेडची मागणी अमान्य करताना अमरावतीला स्पध्रेत खेळण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे  महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस क्रिष्णन मुथूकुमार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘राज्य संघटनेला या अशा घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. ३७ जिल्ह्यंपैकी प्रत्येक वेळी केवळ २५-२६ जिल्हेच सहभाग घेतात. १०-१२ जिल्ह्यंकडे संघही नाहीत. या वेळी प्रत्येकाने आपला संघ दाखवण्यासाठी इतर जिल्ह्यंचे खेळाडू आयात केले. रत्नागिरीच्या संघातील सर्व खेळाडू मुंबईचे आहेत. कोणत्या जिल्ह्यतील खेळाडूंनी कोणत्या संघातून खेळायचे, हे त्या-त्या जिल्हा संघटनेची जबाबदारी आहे. त्यांनी कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच निर्णय घ्यायचा. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असेल तर वर्षांतून एक वेळा खेळाडू इतर जिल्ह्यंकडून खेळू शकतात, असा नियम सांगतो.’