गुवाहाटी : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला. महाराष्ट्राने ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि १०१ कांस्यपदकांसह एकूण २५६ पदकांची कमाई करत विजेतेपद मिळवले. हरयाणा २०० पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली १२२ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे. बुधवारी नवीनचंद्र बाडरेली स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राने यंदा २० क्रीडाप्रकारांपैकी १९ खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जलतरणात सर्वाधिक ४६ पदकांची कमाई महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. जिम्नॅस्टिक्समध्ये ४०, कुस्तीमध्ये ३१, अॅथलेटिक्समध्ये २९ आणि वेटलिफ्टिंगमध्ये २५ पदके मिळवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा राखला. टेनिसमध्ये स्नेहल-मिहिकाला सुवर्ण अखेरच्या दिवशी टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या स्नेहल माने आणि मिहिका यादव यांनी २१ वर्षांखालील महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी तेलंगणाच्या समा सात्त्विका आणि श्राव्या चिलाक्लापुडी यांचा ६-३, १०-७ असा पाडाव केला. मुलांच्या गटात दक्ष अग्रवाल आणि यशराज दळवी यांना हरयाणाच्या ध्रूवन हुडा-चिराग किशन जोडीकडून १-६, ७-१० अशी हार पत्करावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जलतरणात करिनाची सोनेरी कामगिरी महाराष्ट्राच्या करिना शांता हिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात २०० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकून सोनेरी सांगता केली. महाराष्ट्राच्या वेदांत बापना व आरोन फर्नाडिस यांनी रौप्यपदकाची कमाई केली. मुंबईच्या करिनाने २०० मीटरचे अंतर २ मिनिटे ४२.९७ सेकंदांत पार केले. महाराष्ट्राच्याच अनुष्का पाटील (२ मिनिटे ४४.१३ सेकंद) व झारा जब्बार (२ मिनिटे ४७.७८ सेकंद) यांनी अनुRमे रौप्य व ब्राँझपदक पटकावित वर्चस्व गाजविले.