फैजल फाजल व गौरव उपाध्याय यांनी दमदार अर्धशतके करुनही विदर्भास महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळविण्यात अपयश आले. पहिल्या डावात १६ धावांची आघाडी मिळविणाऱ्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३ बाद ९५ धावा केल्या. हा सामना नागपूर येथे सुरु आहे.
महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या २८२ धावांना उत्तर देताना विदर्भाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी शैलीदार खेळ केला, तरीही आघाडी मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. सलामीवीर फैजल फाजल याने आक्रमक खेळ करीत ६१ धावा केल्या. हेमांग बदानी (४७) व गौरव उपाध्याय (७७) यांनी आत्मविश्वासाने फलंदाजी केली. पहिल्या डावात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या श्रीकांत वाघ याने नाबाद ३१ धावा करीत संघास आघाडी मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तथापि महाराष्ट्राच्या समाद फल्लाह (३/४५), श्रीकांत मुंढे (२/३९) व चिराग खुराणा (२/७२) यांच्या गोलंदाजीपुढे विदर्भचा डाव २६६ धावांमध्ये आटोपला.