महेंद्रसिंग धोनीने साकारलेल्या शतकाच्या बळावर विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत झारखंडने छत्तीसगडवर ७८ धावांनी शानदार विजय मिळवला.

छत्तीसगडचा कर्णधार मोहम्मद कैफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर झारखंडची १४.४ षटकांत ५ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था झाली. परंतु धोनीने १०७ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांसह १२९ धावांची नेत्रदीपक खेळी साकारून संघाचा डाव सावरला. शाहबाझ नदीमने ४ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावा काढत त्याला छान साथ दिली. धोनी आणि नदीमने सातव्या विकेटसाठी १६६ चेंडूंत १५१ धवांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे झारखंडला ९ बाद २४३ धावसंख्या उभारता आली. मग वरुण आरोन आणि नदीमच्या गोलंदाजीमुळे छत्तीसगडचा डाव १६५ धावांत गडगडला.

संक्षिप्त धावफलक

झारखंड : ५० षटकांत ९ बाद २४३ (महेंद्रसिंग धोनी १२९, शाहबाझ नदीम ५३; अभ्युदय कांत सिंग ४/३३, पंकज राव ३/२७) विजयी वि. छत्तीसगड : ३७.४ षटकांत सर्व बाद १६५ (अभ्युदय कांत सिंग २४; वरुण आरोन ३/२६, शाहबाझ नदीम ३/३६)

 

महाराष्ट्राचा केरळवर दणदणीत विजय

कटक : महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत दुसऱ्या विजयाची नोंद करताना केरळवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ७९ धावांची खेळी करणारा ऋतुराज गायकवाड आणि ३३ धावांत ४ बळी घेणारा प्रदीप दाढे महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्व बाद ३११ धावा केल्या. यात गायकवाड, केदार जाधव आणि नौशाद शेख यांच्या अर्धशतकांचा समावेश आहे. जाधवने ५ चौकार आणि ५ षटकारांसह ४८ चेंडूंत ७१ धावा केल्या. जलाज सक्सेनाने ५१ धावांत ४ बळी घेतले.

त्यानंतर महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी केरळचा डाव फक्त १८९ धावांत संपुष्टात आणला. इक्बाल अब्दुल्ला (६०) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५०) वगळता केरळचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक

  • महाराष्ट्र : ५० षटकांत सर्व बाद ३११ (ऋतुराज गायकवाड ७९, केदार जाधव ७१; जलाज सक्सेना ४/५१) विजयी वि. केरळ ३९.५ षटकांत सर्व बाद १८९ (इक्बाल अब्दुल्ला ६०, मोहम्मद अझरुद्दीन ५०; प्रदीप दाढे ४/३३, शामशुझमा काझी ३/२५)