१९७० – ८०च्या दशकात क्रिकेट या खेळात वेगवान गोलंदाजांचा दबदबा होता. पुढे काळानुसार क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले. पाटा खेळपट्ट्या, लहान आकाराची मैदाने, बदललेले नियम, उत्तम प्रतीच्या बॅट व अद्यायावत तंत्रज्ञानामुळे क्रिकेट हा खेळ गेल्या काही वर्षात केवळ फलंदाजांचाच खेळ म्हणून चर्चेत आहे. हे फलंदाज जवळपास प्रत्येक सामन्यात कोणते ना कोणते विक्रम करत असतात. असाच एक विक्रम २३ वर्षीय मकरंद पाटीलने केला आहे.

या मराठमोळ्या तरुणाने सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मुंबईतील सचिन तेंडूलकर जिमखाना स्टेडियममध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स विरुद्ध एफ डिव्हीजन या दोन संघात झालेल्या सामन्यात महिंद्रा लॉजिस्टिक्स संघातून खेळताना मकरंदने सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम केला. त्यानंतर त्याने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार मारला असे त्याने सात चेंडूत सात षटकार मारले. मकरंद आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. या खेळीदरम्यान त्याने २६ चेंडूत ८४ धावा केल्या. याआधी २००७ साली टी ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध युवराज सिंहने सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम केला होता.

“सहा चेंडूत सहा षटकार मी मारु शकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु सलग चार षटकार मारल्यानंतर प्रेक्षकांत माझ्या नावाचा जयघोष सुरु झाला. या आवाजाने मी भाराऊन गेलो. माझा आत्मविश्वास उंचावला आणि अंतीम दोन चेंडूंवर दोन षटकार मी मारले.” सामना संपल्या नंतर मकरंदने अशा भावना व्यक्त केल्या.

मकरंद एका गरीब कुटूंबातला मुलगा आहे. त्याचे वडिल शॉपिंगमॉलमध्ये एका सेल्समनची नोकरी करतात. तुटपुंज्या पगारात घर चालवणाऱ्या वडिलांना मकरंदला भारतीय संघात खेळताना पाहण्याची इच्छा आहे. आपल्या वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मकरंद जीवतोड मेहनत करत आहे.