नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकेर आणि एल्वनिल वलरिवन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मनूने १० मी. एअर पिस्तुल आणि एल्वनिलने १० मी. एअर रायफल प्रकारात पदक पटकावलं. अंतिम फेरीत २४४.७ गुणांची कमाई करत मनूने पहिल्या क्रमांक पटकावला. या प्रकारात सर्बियाच्या खेळाडूला रौप्य तर चीनच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. याच प्रकारात भारताची आणखी एक नेमबाज यशस्विनी सिंह सहाव्या क्रमांकावर फेकली गेली.

दुसरीकडे १० मी. एअर रायफल प्रकारात एल्वनिलने अंतिम फेरीत २५०.८ गुणांची कमाई केली. या प्रकारात तैवानच्या नेमबाजपटूला रौप्य तर रोमानियाच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पात्रता फेरीतही एल्वनिलने चिनी प्रतिस्पर्ध्यांची झुंज मोडून काढत ६३१.१ गुणांची कमाई केली. भारताच्या मेहुली घोषला अंतिम फेरीत सहाव्या स्थानी समाधान मानावं लागलं. पुरुषांमध्ये १० मी. एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र त्यांना पदक मिळवता आलं नाही.