ट्वेन्टी-२० विश्वचषकाविषयी मार्क टेलर यांचे मत

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणे अशक्य असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घालवू नये, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केली आहे.

२८ मे रोजी ‘आयसीसी’ची क्रिकेट ऑस्ट्रेलियासह बैठक होणार असून यादरम्यान विश्वचषकासंबंधीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. विश्वचषक रद्द झाल्यास त्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन करण्यासाठी नक्की प्रयत्न करावेत, असे टेलर यांना वाटते.

‘‘सध्याचे चित्र पाहता यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार नाही, असेच वाटते; परंतु ‘आयसीसी’ने पुढील आठवडय़ातील बैठकीदरम्यानच अंतिम निर्णय घ्यावा, जेणेकरून खेळाडूंसह नियामक मंडळे पुढील योजना आखू शकतील,’’ असे टेलर म्हणाले.

‘‘विश्वचषक रद्द करण्यात आल्यास अथवा पुढे ढकलला तर ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी वापरता येऊ शकतो. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया नक्कीच अनुमती देईल, कारण भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात जाणार असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया ‘बीसीसीआय’शी अधिक वादविवाद घालत बसणार नाही,’’ असेही टेलर यांनी सांगितले.