आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे वायू गळतीत काही जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनानं यानंतर त्वरित कारवाई करत पाच गावंही रिकामी केली होती. तसंच बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाठवण्यात आलं होतं. या घटनेनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसंच ही दृश्य हृदयद्रावक असल्याचं सचिन म्हणाला. सचिन व्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांनीदेखील या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

विशाखापट्टणमधून समोर आलीली दृश्य ही हृदयद्रावक आहेत. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाल्या त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसंच जी लोकं या घटनेमुळे आजारी पडली आहे ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो, असं सचिन म्हणाला. सचिननं ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशाखापट्टणमध्ये घडलेली ही घटना अतिशय दुर्देवी आहे. माझ्या प्रार्थना सर्वांसोबत आहेत, असं मत टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं व्यक्त केलं. विशाखाटपट्टणममधील दुर्देवी घटनेत ज्या लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. तसंच जे लोक रुग्णालयात दाखल आहेत ते त्वरित बरे व्हावे अशी मी प्रार्थना करत आहे, असं विराट कोहली म्हणाला.

गुरूवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जणांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.