सुट्टीच्या दिवशी आझाद मैदान, ओव्हल, शिवाजी पार्कवरील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सामन्यांना बऱ्याचदा हुल्लडबाजीचा अनुभव येतो. एमसीएच्या सामन्यांना अन्य खेळपट्टीवर सामना खेळणाऱ्या खेळाडूंकडून अनेक अडथळे येतात. यासाठी एमसीएने नुकतीच गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या सामन्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. या पाश्र्वभूमीवर एमसीएला स्थानिक क्रिकेटचा त्रास होत असेल, तर त्यांनी स्पर्धात्मक क्रिकेटसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करावी, असा सूर ‘चर्चेच्या मैदानातून’ या व्यासपीठावर उमटत आहे. याबाबत एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत आणि क्रीडा संघटक आणि दादाजी कोंडदेव पुरस्कार विजेते मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी आपली मते व्यक्त केली.

पी. व्ही. शेट्टी
(एमसीएचे संयुक्त सचिव)
टेनिस क्रिकेट खेळणारे किंवा स्थानिक खेळाडू वर्षभरापूर्वी सकाळी ९ वाजता मैदान रिकामे करायचे आणि आमचे सामने ९.३० वाजता सुरू व्हायचे. पण या वर्षांपासून मात्र आम्हाला त्यांच्या हुल्लडबाजीचा आणि अडथळ्यांचा त्रास होत असल्याने आम्ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. टेनिस क्रिकेट किंवा स्थानिक क्रिकेटला आमचा विरोध नाही. खरे तर त्यांच्यामधूनच आम्हाला खेळाडू मिळत असतात, त्यांना आम्ही विरोध करत नाही. पण त्यांच्यामुळे आमच्या सामन्यांमध्ये अडथळ येतो तो येऊ नये, एवढाच आमचा यामागील मानस आहे.

भास्कर सावंत
(मैदान बचाव समिती अध्यक्ष)
एमसीए ही एक मोठी संघटना आहे, त्यांच्याकडे बराच पैसा आणि जागादेखील आहेत, त्या ठिकाणी त्यांनी आपले सामने भरवावेत. मैदान हे सर्वासाठी आहे, त्यामध्ये संरक्षणाचा किंवा आरक्षणाचा विषय येऊ शकत नाही. क्रिकेटसारखा खेळ १४ देशांत खेळला जातो. मैदानात जर काही खेळाडू ऑलिम्पिकमधील खेळांचा सराव करत असतील, तर क्रिकेटला कशाला अवास्तव महत्त्व द्यायचे. त्याचबरोबर स्थानिकांना खेळण्यासाठी ही मैदाने आहेत, ते कुणासाठी राखीव ठेवता कामा नयेत. गृहमंत्रालयानेही त्यांच्यासाठी संरक्षण देण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नये. स्वत:साठी उपाययोजना करण्यासाठी एमसीए सक्षम आहे.

उदय देशपांडे
(मल्लखांब प्रशिक्षक)
मुळात एमसीएने पोलिसांकडे जायची गरज नव्हती. कारण ही समस्या समन्वयाने सुटण्यासारखी आहे. यासाठी सर्वानी एकत्र येऊन चर्चा करावी आणि तोडगा काढावा.
एमसीएने थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहिणे निश्चितच योग्य नाही. कोणताही खेळ छोटा नसतो. त्यामुळे एका खेळाने किंवा संघटकांनी दुसऱ्यांना दुय्यम दर्जाचे समजू नये. जसे एमसीएचे क्रिकेट आहे, तेवढेच महत्त्वाचे टेनिस, स्थानिक क्रिकेट आणि अन्य खेळही आहेत. विकसित खेळांनी खरे तर विकसित खेळांना मदत करणे अपेक्षित
आहे, पण एमसीएकडून तसे होताना दिसत नाही.