भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) विपणन समितीने आगामी २०१४-१५ वर्षांसाठी जेतेपदांच्या प्रयोजकत्वाचे हक्क मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड कंपनीला १८ कोटी रुपयांना दिले आहेत. ‘‘मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड कंपनीने सर्वाधिक १८ कोटी एक लाख आणि ८० हजार रुपयांची बोली लावत २०१४-१५ वर्षांसाठी जेतेपदांच्या प्रयोजकत्वाचे हक्क मिळवले आहेत,’’ असे बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे. या बोलीनुसार मायक्रोमॅक्स कंपनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्रत्येक सामन्यासाठी २.०२ कोटी रुपये देणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक ट्वेन्टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे.