भारत आणि ऑस्ट्रेलिया यांत्यातली मालिका म्हटली की दोन्ही संघातील खेळाडूंमधल्या शाब्दीक चकमकी या आल्याच. सध्या सुरु असलेल्या मालिकेत पर्थ कसोटी सामन्यात विराट कोहली आणि टीम पेन यांच्यात मैदानात झालेला वाद चांगलाच रंगला. यावरुन अनेक माजी खेळाडूंनी विराटवर टीका केली. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मिचेल जॉन्सननेही विराटच्या आक्रमक स्वभावावर जहरी टीका केली होती. यानंतर अनेक माजी खेळाडू विराटच्या समर्थनासाठी उतरले, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआयने दिलेल्या क्लिन चीट नंतर हा वाद आता पुढे वाढणार नाही असं वाटत असतानाच जॉन्सनने कोहलीला डिवचलं आहे. अजिंक्य रहाणे हा भारताचा चांगला कर्णधार होऊ शकतो असं जॉन्सनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : गोलंदाज चांगल्या लयीत, फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करण्याची गरज – अजिंक्य रहाणे

“सामना संपल्यानंतर प्रत्येक प्रतिस्पर्धी खेळाडूशी खुल्या मनाने तुम्ही बोलायला हवं. चांगला खेळ झाला असं म्हणत हस्तांदोलनही करावं. मात्र पर्थ कसोटी सामन्यानंतर विराटने टीम पेनशी संवाद साधला नाही. त्याच्याशी बोलणं टाळून विराट औपचारिकता केल्यासारखं वागला. त्याचं हे वागणं मला अपमानजनक होतं.” फॉक्स स्पोर्ट्ससाठी लिहीलेल्या कॉलममध्ये जॉन्सनने आपले विचार मांडले होते. यावेळी जॉन्सनने भारतीय चाहत्यांशी सुरु असलेल्या संवादात अजिंक्य भारताचा चांगला कर्णधार होऊ शकतो असं म्हटलं आहे.

4 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आलेली असताना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना सुरु होत आहे. या सामन्यासाठी भारताने नवोदीत मयांक अग्रवालला संघात स्थान दिलेलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमा विहारी या सामन्यात मयांकसोबत सलामीसाठी येऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, मयांक अग्रवालला संघात स्थान