विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वन-डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला व्हाईटवॉश देत न्यूझीलंडने टी-२० मालिकेतील पराभवाचा वचपा काढला. भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी हे वन-डे मालिकेतल्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. जसप्रीत बुमराहला या मालिकेत एकही बळी मिळालेला नाही. या कामगिरीनंतर बुमराहवर टीकाही झाली. भारतीय संघातला त्याचा साथीदार मोहम्मद शमीने मात्र बुमराहची पाठराखण केली आहे.

“एका-दुसऱ्या सामन्यातील अपयशानंतर बुमराहच्या क्षमतेवर शंका घेणं चुकीचं आहे. त्याच्या अपयशावर चर्चा होण्याचं कारणच मला समजलं नाही. त्याने याआधी भारताला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिलाय, त्याकडे आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही”, न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळल्यानंतर शमी पत्रकारांशी बोलत होता.

२१ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.