भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाला सामोरे जाताना भारतीय खेळाडूंवर अतिरिक्त दडपण असेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने व्यक्त केली.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेद्वारे प्रारंभ होत आहे. परंतु ३२ वर्षीय कोहली १७ डिसेंबरपासून होणाऱ्या प्रकाशझोतातील कसोटीत खेळल्यानंतर पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतणार आहे. त्यामुळे अन्य तीन कसोटींमध्ये कोहलीच्या अनुपस्थितीत भारताची अग्निपरीक्षा असेल, असे पाँटिंगला वाटते.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीची अनुपस्थिती चाहत्यांना प्रकर्षांने जाणवेल, परंतु भारतीय खेळाडूंवर त्याच्या अनुपस्थितीचे अतिरिक्त दडपण येईल. त्यामुळे तिन्ही आघाडय़ांवर भारताचे खेळाडू कशाप्रकारे कामगिरी उंचावतात, हे पाहणे रंजक ठरेल,’’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला दिलेल्या खास मुलाखतीत पाँटिंग म्हणाला.

‘‘कसोटी प्रकारात संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. अशा वेळी कोहलीची जागा कोणता फलंदाज घेणार, हे निर्णायक ठरेल. तसेच कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करण्याची शक्यता असल्याने त्याला स्वत:च्या फलंदाजीबरोबरच संघाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्यही करावे लागणार आहे. एकंदर भारतीय फलंदाजांवर प्रामुख्याने त्यांच्या संघातील भूमिकांविषयी अधिक दडपण असेल,’’ असेही पाँटिंगने सांगितले.

रोहितची तंदुरुस्तीकडे वाटचाल

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने गुरुवारी बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती प्रशिक्षणाला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी रोहितला संघात स्थान लाभलेले नाही, परंतु कसोटी मालिकेत तो खेळताना दिसेल. ‘आयपीएल’च्या बाद फेरीच्या वेळी रोहितने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले. मात्र ‘बीसीसीआय’च्या आदेशानुसार त्याने स्नायूंच्या दुखापतीतून सावरण्यासाठी बेंगळूरु गाठले.