रोहित शर्माला आराम दिल्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर धोनी कर्णधार म्हणून मैदानात उतरला. कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. धोनी कर्णधार असताना सामना बरोबरीत सुटण्याची ही काही पहिलीवेळ नाही. याआधीही चार वेळा असा कारनामा झाला आहे. धोनी कर्णधार असताना पाचव्यांदा सामना बरोबरीत सुटला. विक्रमांवर नजर टाकल्यास या यादीत सर्वात आघाडीवर नाव धोनीचे आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन, ऑस्ट्रेलिया चा स्टीव वॉ आणि दक्षिण अफ्रीकाच्या शॉन पोलाक यांचा क्रमांक लागतो. यांच्या नेतृत्वात प्रत्येकी तीन-तीन सामने बरोबरीत सुटले आहे. जाणून घेऊयात धोनीच्या नेतृत्वात बरोबरीत सुटलेले सामने... > २७ फेब्रुवारी २०११ मध्ये भारत आणि इंग्लंड सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीच्या बळावर ३३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल खेळताना इंग्लंड संघाला ५० षटकांत ३३८ धावाच करता आल्या. आणि हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना इंग्लंड संघाला मुनाफ पटेलने १३ धावांतच रोखले. > ११ सप्टेंबर २०११ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेला झालेला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात धोनी (७८) आणि सुरेश रैना (८४) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने पाच बाद २८० धावा केल्या. २८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघ ४८.५ षटकांत ८ बाद २७० धावांवर खेळत होता. त्यावेळी मैदानावर पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना सुरू झाला नाही. पंचानी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर सामना टाय घोषीत केला. > १४ फेब्रुवारी २०१२ रोजी कॉमनवेल्थ बँक सिरीजच्या एडिलेड येथे श्रीलंका आणि भारतामध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २३६ धावा केल्या. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ९ धावांची गरज होती. लसिथ मलिंगाने भेदक गोलंदाजी करताना फक्त ८ धावा दिल्या. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज होती मात्र धोनीला फक्त तीन धावाच करता आल्या. > २५ जानेवारी २०१४ रोजी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात ऑकलँड येथे झालेला सामनाही बरोबरीत सुटला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना गप्टिलच्या शतकी खेळीच्या बळावर ३१४ धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल फलंदाजी करताना भारतीय संघही २१४ धावापर्यंत मजल मारू शकला. अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी १८ धावांची गरज होती पण जाडेजा फक्त १७ धावाच करू शकला. या सामन्यात जाडेजाने ४५ चेंडूत धडाकेबाज ६६ धावांची खेळी केली.