पहिल्या डावात आघाडी मिळवत शेष भारत संघाने विजयाच्या दिशेने कूच केली असून रणजी विजेता मुंबईचा संघ हा सामना गमावणार, असे काही जणांचे म्हणणे असले तरी अजिंक्य रहाणेला मात्र अजिबात असे वाटत नाही. ‘‘पहिल्या डावात आम्ही चांगली फलंदाजी केली, पण कुठेतरी नक्कीच कमी पडलो. त्यामुळे आम्हाला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही. पण अजूनही सामन्याचे दोन दिवस बाकी आहेत, गोलंदाजी करताना कमीत कमी धावांमध्ये जास्तीत जास्त बळी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे अजूनही सामना संपलेला नाही. सामन्यात अजूनही आमचे आव्हान बाकी आहे,’’ असे अजिंक्य म्हणाला.
‘‘माझी फलंदाजी चांगली झाली. फटके चांगले लागत होते. पण शतक न झाल्याने नक्कीच निराश आहे. कारण शतकाला फार महत्त्व असते. फलंदाजी करताना ५२६ धावांचा विचार करत नव्हतो, आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करण्याचाच प्रयत्न केला. दुसरा डाव आमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल,’’ असे अजिंक्यने सांगितले.
शेष भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत म्हणाला की, ‘‘सचिन हा एक महान फलंदाज आहे. त्याला बाद करणे माझे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. मुंबईचा संघ चांगलाच बलवान आहे, त्यामुळे आघाडी घेतल्यावरही अधिकाधिक धावा करण्यावर आमचा भर असेल.’’