‘वो सत्तर मिनिट …’ हा शाहरुख खानचा चख दे इंडिया चित्रपटातील डायलॉग आपणा सगळ्यांना चांगलाच लक्षात असेल. सामना सुरु होण्याआधी टीम मिटिंगला किती महत्व असते, हे त्या चित्रपटातील त्या भाषणाने दिसून आले. अशीच एक टीम मिटिंग चेन्नईच्या संघाचीही अंतिम सामन्याआधी झाली आणि त्यामुळे धोनीच्या चेन्नईने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयाबरोबर त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद तिसऱ्यांदा पटकावले. सनरायझर्स हैदराबाद संघाला चेन्नईने मोठ्या फरकाने पराभूत केले. हंगामादरम्यान त्यांच्या काही महत्वाच्या खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना विजयाचा मार्ग सोपा नव्हता, पण धोनीच्या संयमी नेतृत्वामुळे चेन्नईने सामना आणि स्पर्धा जिंकली.

या विजयाआधी त्यांची जी टीम मिटिंग झाली, त्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली असेल आणि त्यातूनच हा सामना जिंकणे सोपे झाले असेल, असा सर्वसाधारणपाने अंदाज बांधला गेला. पण, प्रत्यक्षात मात्र या सामन्याआधी खूप वेळ टीम मिटिंग झालीच नाही. धोनीने या बाबत एका कार्यक्रमात स्पष्ट केले. धोनी म्हणाला की आमच्या मिटिंगसाठी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी “गो, गेट ईट!” या तीन शब्दात मिटिंग संपवली. केवळ ५ सेकंदामध्ये ही मिटिंग संपली आणि आम्ही सारे मैदानावर गेलो.

संघातील प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका माहिती होती. त्यामुळे मिटींगमध्ये अधिकचे काही बोलावे, असे प्रशिक्षकांना वाटले नसेल, असेही धोनीने यावेळी सांगितले.