टीम इंडियाचा युवा कॅप्टन विराट कोहली संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात लागोपाठ विजय प्राप्त करून देणारा पहिला कर्णधार ठरला. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेपाठोपाठ ट्वेन्टी-२० मालिकेतही विजय प्राप्त केला. अर्थात इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होण्याआधी कॅप्टनकूल धोनीने कॅप्टनशीपवरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण तो संघात यापुढेही खेळणार असल्याचे सांगितले होते. कोहलीला गरज पडल्यास मैदानात मदत करणार असल्याचेही तो म्हणाला होता. धोनी आपल्या वचनाला जागला. कारण, इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत कोहली वेळोवेळी धोनीचा सल्ला घेताना दिसून आला. धोनीने कॅप्टनशीपवरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कोहली संघाचा कॅप्टन नसला तरी तो आमचा सर्वांचा कॅप्टनच आहे. मैदानात धोनीची मला खूप मदत होईल, असे म्हटले होते. आता कोहलीने पुन्हा एकदा धोनी सरांची मैदानात खूप मदत मिळत असल्याचे सांगितले.

 

इंग्लंडविरुद्धचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना खिशात टाकल्यानंतर कोहलीने पत्रकारांशी संवाद साधताना धोनीकडून मिळत असलेल्या सहकार्याचा आवर्जुन उल्लेख केला. तो म्हणाला की, मी कसोटीमध्ये संघाचे नेतृत्त्व केले. पण एकदिवसीय, ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्त्व माझ्याकडे लवकर आले. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमधील कॅप्टनशीपचा मोठा अनुभव धोनीच्या गाठीशी आहे. त्याची मला चांगली मदत होते. म्हणून मैदानात मी धोनीचा वेळोवेळी सल्ला घेत असतो आणि धोनी देखील तितक्याच तत्परतेने मला मदत करतो.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकाबाबत एक रोमांचक गौप्यस्फोट देखील कोहलीने यावेळी केला. यझुवेंद्रची चार षटके संपल्यानंतर शेवटचे निर्णायक षटक हार्दिक पंड्याला देण्याचा कोहलीचा विचार होता. पण नेहरा आणि धोनीने बुमराहकडून षटक टाकण्याचा सल्ला दिला. बुमराहने शेवटच्या षटकात केवळ दोन देऊन दोन विकेट्स घेत विजयश्री खेचून आणला, असे कोहलीने सांगितले.