पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा लॉकडाउन काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. सुरूवातीला भारत-पाक क्रिकेट सामने भरवण्यात यावेत या मागणीला त्याने पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर करोनाग्रस्त भागात मदतीला गेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविषयी त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर त्यानंतर त्याने, शोएब अख्तर आणि सईद अजमलचा सामना करायला सचिन घाबरायचा, असे म्हटले होते. पण आता मात्र आफ्रिदी कोणत्याही वादग्रस्त कारणाशिवाय चर्चेत आला आहे.

शाहिद आफ्रिदी काही दिवसांपूर्वी करोनाग्रस्त झाला होता. त्यानंतर योग्य औषधोपचारांनी त्याने करोनावर मात केली. पण अजूनही तो विश्रांती घेत असल्याने घरातच आहे. त्यामुळे तो काही चाहत्यांच्या प्रश्नांची ट्विटरवरून उत्तरं देताना दिसला. आफ्रिदीला एका चाहत्याने प्रश्न विचारला, “चांगला कर्णधार कोण? महेंद्रसिंग धोनी की रिकी पॉन्टींग?” या प्रश्नावर आफ्रिदीने स्पष्ट उत्तर दिलं. “पॉन्टींगपेक्षा मी धोनीला जास्त मार्क देईल कारण त्याने नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन संघ उभा केला”, असं सांगत त्याने धोनीचं कौतुक केले.

शोएब अख्तर, सईद अजमलचा सामना करायला सचिन घाबरायचा!

“सचिन स्वतःच्या तोंडाने तर सांगणार नाही की होय मी घाबरायचो. पण शोएब अख्तरने आपल्या कारकिर्दीत असे काही स्पेल टाकलेत की तिकडे सचिनच नाही अनेक दिग्गज फलंदाजांना भीती वाटली होती. मी असं म्हणणार नाही, की शोएबने सचिनला नेहमीच घाबरवलं. पण काही स्पेलमध्ये शोएबचा सामना करताना सचिनचे पाय कापताना मी पाहिले आहेत. विश्वचषकादरम्यान सचिन अजलमचा सामना करायलाही घाबरायचा. पण यात काही मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. खेळाडूंवर अनेकदा दबाव असतो, त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यासाठी कठीण होऊन जातात”, असे आफ्रिदी म्हणाला होता.