भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतावर उपांत्य फेरीत १८ धावांनी मात केली. २४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताचे दिग्गज फलंदाज आज न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर पुरते कोलमडले. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाचा पराभव मान्य करत न्यूझीलंडचं कौतुकही केलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : ती ४५ मिनीटं आम्हाला महाग पडली, विराटने स्विकारला भारताचा पराभव

अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी शतकी भागीदारी रचत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. धोनीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने साहजिकच विराटला पत्रकार परिषदेमध्ये धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नाला उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, “आम्हाला याबद्दल अजुन काही माहिती नाहीये, धोनीने निवृत्तीबद्दल आम्हाला काहीच कळवलेलं नाहीये.” विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.

रविंद्र जाडेजाने ७७ तर महेंद्रसिंह धोनीने ५० धावा केल्या. मात्र मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज माघारी परतल्यामुळे भारताचा संघ सामन्यात बॅकफूटला गेला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड समोरासमोर येणार आहेत. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत न्यूझीलंडशी खेळणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : उपांत्य सामन्यातलं दुष्टचक्र विराटची पाठ सोडेना, ऋषभ पंत मात्र ठरला लकी