भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बनवण्यात आलेल्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन समाधानी नसले तरी क्युरेटर प्रबिर मुखर्जी यांना मात्र त्याची पर्वा नाही. श्रीनिवासन यांच्या टीकेला मुखर्जी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘मी काय करायचे, हे आता श्रीनिवासन मला शिकवणार आहेत का? मी त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकणार नाही. खेळपट्टी बनवताना मी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याशीही बोललो नाही. माझे ज्ञान आणि अनुभव या जोरावरच मी खेळपट्टी तयार केली. वर्तमानपत्रात माझ्यावर सातत्याने टीका होत असल्यामुळे मी हल्ली वर्तमानपत्रे वाचणेसुद्धा टाळतो,’’ असे मुखर्जी यांनी सांगितले.
ईडन गार्डनचे क्युरेटर म्हणून मुखर्जी यांची कारकीर्द संपुष्टात येणार आहे, अशी चर्चा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ जानेवारीला होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी ‘कॅब’ अन्य क्युरेटरचा शोध घेत आहेत. मुखर्जी यांच्या बेधडक वागण्यावर श्रीनिवासन नाराज आहेत. एक तर ८३ वर्षांच्या मुखर्जी यांना सरळ करा किंवा कडक पावले उचलण्यासाठी तयार राहा, असे आदेश त्यांनी दालमिया यांना दिले आहेत. मुखर्जीना हटवा, अन्यथा ईडन गार्डन्सवर यापुढे एकही सामना होणार नाही, अशी ताकीदही श्रीनिवासन यांनी दिल्याचे ‘कॅब’च्या सूत्रांकडून समजते.