मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी होण्याआधी मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे.

भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील या निवड समितीमध्ये भारताचे माजी फिरकी गोलंदाज नीलेश कुलकर्णी, सुनील मोरे आणि रवी ठक्कर यांचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारीच चारही सदस्यांनी आपले राजीनामे सादर केले, अशी माहिती ‘एमसीए’च्या सूत्रांनी दिली.

नुकत्याच झालेल्या ‘एमसीए’च्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये निवड समिती सदस्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यामुळे निवड समिती सदस्यांवरील दडपण वाढले होते. परंतु क्रिकेट सुधारणा समितीने त्यांना पाठबळ दिले होते. गुरुवारी रात्री इंदूर येथे सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेसह यंदाचा स्थानिक हंगाम संपला आणि निवड समिती सदस्यांनी आपले राजीनामे दिले. यासंदर्भात सुकाणू समितीने कायदेशीर सल्ला घेतल्याची माहिती मिळत आहे.