ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरूवातीला काहीशी डगमगली. पण तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत संघावरील दबाव कमी केला. शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली.

शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. ११५ चेंडूत त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत अर्धशतक केले. या खेळीनंतर त्याने BCCI आणि संघ व्यवस्थापनाला या यशाचं श्रेय दिलं. “भारत अ संघाच्या निमित्ताने याआधी अनेकदा ऑस्ट्रेलियात यायला मिळालं आहे. अशा दौऱ्यांमुळेच अनुभवी खेळाडूंची दुसरी फळी तयार होण्यास मदत होते. आम्हाला अशा दौऱ्यांची खूप मदत होते. २०१६ पासून आम्ही ऑस्ट्रेलियात अ संघासोबत येत आहोत. चार-दिवसीय सामने खेळत आहोत. कसोटीची खेळपट्टी इतर सामन्यांपेक्षा जरी वेगळी असली, तरी खेळपट्टीच्या स्वभावाचा अंदाज अशा दौऱ्यांमुळेच येतो. अ संघातून थेट वरिष्ठ संघात जेव्हा संधी मिळते तेव्हा तो प्रवास फारसा महत्त्वाचा नसतो. तुम्ही संधी मिळाल्यावर कसं खेळता ते अधिक महत्त्वाचं असतं”, असं शार्दुल म्हणाला.

षटकार मारत साजरं केलं अर्धशतक-

दरम्यान, शार्दुलसोबत वॉशिंग्टन सुंदरनेही अर्धशतक (६२) ठोकलं. या दोघांच्या खेळीच्या जोरावर एकेकाळी ६ बाद १८६ अशी अवस्था असणाऱ्या भारतीय संघाने ३३६ धावांपर्यंत मजल मारली. सुंदर-शार्दुल या दोघांनी १२३ धावांची भागीदारी रचली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. दोघांनीही आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या विकेटसाठी ही भारताची सर्वात मोठी भागीदारी ठरली.