मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा अचूक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी अपेक्षित साथ दिल्याने मुंबईला सेनादलावर सहा विकेट्सने सहज विजय मिळवता आला. तिखट मारा करत मुंबईने सेवादलाला १५१ धावांमध्येच गुंडाळले आणि हे आव्हान २५.२ षटकांमध्ये सहजपणे पूर्णही केले.
नाणेफेक जिंकत मुंबईने सेनादलाला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. सेनादलाच्या नकुल वर्मा (५०) आणि रजत पलिवाल (४१) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. शार्दूलने वेगवान मारा करत सेवादलाच्या चार फलंदाजांना माघारी धाडले, तर धवल कुलकर्णी, शशांक सिंग आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
सेनादलाच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अखिल हेरवाडकर (४६) आणि श्रेयस अय्यर (३५) यांनी चांगली धावसंख्या रचली.

संक्षिप्त धावफलक
सेनादल : ४२.१ षटकांत सर्व बाद १५१ (नकुल वर्मा ५०; शार्दूल ठाकूर ४/१९) पराभूत वि. मुंबई : २५.२ षटकांत ४ बाद १५६ (अखिल हेरवाडकर ४६; अझरुद्दीन ब्लोच २/२७)