सनरायझर्सवरील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ मुंबई इंडियन्सवर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. रविवारी येथे होणारा हा सामना जिंकून आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याचे त्यांचे ध्येय आहे. दिल्ली संघाने सुरुवातीला सातत्यपूर्ण कामगिरी केली होती, मात्र नंतर त्यांच्या खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी होत आहे व त्यांना काही सामने गमवावे लागले आहेत. सनरायझर्सविरुद्धच्या विजयामुळे दिल्लीच्या खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आहे. झहीर खान याच्या नेतृत्वाखाली उतरलेला त्यांचा संघ मुंबईविरुद्धची लढत जिंकण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. हा सामना जिंकला तर त्यांच्या प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा कायम राहणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा सामन्यांमध्ये बारा गुणांची कमाई केली आहे. मुंबईसाठी येथील सामन्यात विजय अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या प्लेऑफच्या संधी दुरावल्या जाणार आहेत. त्यांचेही बारा सामन्यांनंतर बारा गुण झाले आहेत. येथील मैदानावर मुंबईला अपेक्षेइतकी साथ मिळालेली नाही. त्यातच पंजाबविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीचे शल्य त्यांना बोचत आहे. अर्थात दिल्लीविरुद्ध त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड यांच्यावर संघाची भिस्त आहे. दिल्लीचा लेगस्पीनर अमित मिश्रा याने या स्पर्धेत प्रभावी गोलंदाजी केली आहे. त्याच्याबरोबरच नाथन कुल्टरनाईल याच्यावरही दिल्लीची मदार आहे. झहीर खान दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यामुळे त्यांच्या गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. फलंदाजीत क्विन्टॉन डीकॉक, संजू सॅमसन व रिषभ पंत यांच्याकडून दिल्लीस मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे.