आयपीएलच्या नव्या पर्वाचा उद्धाघटनाचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 9 एप्रिलला चेन्नईत रंगणार आहे. मात्र, या सामन्याला काही दिवस उरले असताना मुंबईच्या गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे यष्टीरक्षण प्रशिक्षक किरण मोरे यांना करोनाची लागण झाली आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत ही माहिती दिली. किरण मोरे यांना करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सर्व सूचनांचे ते पालन करत आहेत. मुंबई इंडियन्सचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे, असे मुंबईने आपल्या ट्विटमध्ये सांगितले. Official Statement: Mumbai Indians’ scout and wicket keeping consultant Mr. Kiran More has tested positive for Covid-19. #MumbaiIndians #MI #OneFamily (1/3) pic.twitter.com/Szoweg0MrZ — Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2021 We would like to remind our fans to be safe and follow COVID-19 appropriate behaviours in these difficult times. (3/3) — Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2021 भारतीय यशस्वी यष्टीरक्षकांच्या यादीत किरण मोरे यांना गणले जाते. मोरे यांनी 1984 ते 1993च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे दमदार कामगिरी केली. त्यांनी 49 कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 130 तर, वनडेत 90 फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर मोरे यांनी 2000-2006 पर्यंत बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यपद सांभाळले होते. आयपीएल आणि करोना आयपीएलचे चौदावे पर्व आणि करोना यांचा संबंध घट्ट होत चालला आहे. अक्षर पटेल, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल या खेळाडूंना करोनाची लागण झाली होती.त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्डेडियममधील कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला. धक्कादायक म्हणजे, मुंबईत बायो बबलमध्ये असणाऱ्या 14 प्रक्षेपण कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. आयपीएल’ला सशर्त परवानगी -मलिक मुंबईतील ‘आयपीएल’ सामन्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी स्पष्ट केले. ‘आयपीएल’ सामन्यांचे आयोजन करताना ‘बीसीसीआय’ला महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करण्याची आवश्यकता आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. ‘‘मुंबईत 10 ते 25 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या 10 सामन्यांच्या आयोजनासाठी राज्य शासनाकडून योग्य परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे जैव-सुरक्षित वातावरणात चिंतेची आवश्यकता नाही. खेळाडू आणि साहाय्यक सुरक्षित आहेत,’’ असे गांगुलीने सांगितले.